आदिवासी समाज
जिल्ह्याची एकूण १०,७२,९४२ लोकसंख्या एवढी असून पुरुष व स्त्रिया यांची लोकसंख्या अनुक्रमे ५,४१,३२८ व ५,३१,६१४ एवढी आहे (जनगणना-२०११). जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असून तालुक्याची एकूण लोकसंख्या १,७९,१२० एवढी आहे.जिल्ह्यात आदिवासी जमातीची लोकसंख्या ४,१५,३०६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. त्यांची टक्केवारी ३८.१७ % एवढी आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या १,२०,७४५ एवढी असून एकूण टक्केवारी ११.२५ % आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८.१७ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्र राज्यात ओळखल्या जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक वास्तव्यास आहेत. त्यांची बोलीभाषा “गोंडी, माडिया” ह्या आहेत.
जिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी त्यांची संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे “पेरसा पेन” हे दैवत आहे. ही लोक शुभ कार्य प्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर “रेला” नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात. ” ढोल ” हे सुध्दा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यता जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहेत.
जिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे महात्च्वाचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिध्द “नाटक, तमाशा” इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे गणपती, दसरा, होळी या सणाचे वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन करतात.

Comments
Post a Comment